HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ४|
जमादार विरहांतील जीवन
ग्रीष्म


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



45GOOG
ग्रीष्म

स्वारि बाइ केवि आलि !

घर्मि अंग अंग न्हालि !

आलि गालिं बाइ लालि,

उतरिन जलकुंभ मी ! ध्रु०

तापे शिरिं अंशुमालि,

आग आग भोवतालि,

रखरखीत ह्या अकालिं

अग्निच्या जिभा झळा ! १

तरुतळिं बसुनी विवशी

रवंथ करिति गाइम्हशी,

गुपचुप हे पशुपक्षी

दडति गुहाकोटरीं. २

पक्षि एकटा सुतार

ठकठक करि बेसुमार,

सारखा करी प्रहार,

ध्वनि गभीर खोल हा ! ३

पोपट पिंजर्‍यांत शांत

चित्रसा बसे निवांत,

श्वान हलुनि नखशिखांत

धापा हें टाकितें ! ४

वाटेवर तप्त धूळ,

फिरके ना मुळिं पाउल,

गांव जणूं निद्राकुल,

सामसूम चहुंकडे ५

आगीची उठे लाट,

तप्त भिंति, तप्त वाट,

तप्त वाट, तप्त खाट,

लाहि लाहि काहिली ! ६

ओढ दासिची नितांत,

आलां या वेळिं कांत !

पाय धुतें, बसा शांत,

वारा मी घालितें ! ७

Translation - भाषांतर

N/A
45GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - अरुण

राग - सारंग

ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

दिनांक - १८ ऑक्टोबर १९३५


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-16T03:20:16.8411584Z

Comments | अभिप्राय